नांद्रे : पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या वापरात असलेले वहिवाटीचे रस्ते बंद करण्याच्या हालचालींमुळे नांद्रेतील वातावरण तापले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाविरोधात वाढत चाललेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मंगळवार, दि. 19 मेरोजी एक दिवस कडकडीत नांद्रे बंदची हाक दिली आहे.
मध्य रेल्वे विभागाकडून रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी जाळीचे कंपाउंड उभारण्याच्या कामामुळे शेतीकडे जाणाऱ्या मार्गांवर कायमस्वरूपी गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न देता रेल्वे प्रशासन थेट रस्ते बंद करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती अडचणीत येणार आहे. अनेक वेळा निवेदने, बैठका आणि मागण्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा बंद पुकारला आहे. विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
‘एक दिवस अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी’ या घोषणेसह गावात संघर्षाची ठिणगी पेटली असून प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. शेतकरी नेते महावीर पाटील म्हणाले, पिढ्यान् पिढ्या वहिवाटीचे रस्ते कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता बंद करणे अन्यायकारक आहे. रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांच्या भावना आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. हा लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे. प्रशासनाने तातडीने तोडगा काढला नाही, तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.