दिघंची; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील दिघंची गावातल्या 40 एकर गायरान जमिनीत अतिक्रमण झाले असून त्याची गुंठेवारी पध्दतीने विक्रीही झाली आहे. तशा तक्रारीचे निवेदन माजी ग्रापंचायत सदस्य दशरथ मोरे, राजकुमार पडळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिगंबर मोरे यांनी संबंधितांना दिले आहे. जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 40 एकर गायरानमधील एकूण 1600 गुंठे जमिनीचा आतील 700 गुंठ्याचा परिसर तसेच मल्हार पेठ ते पंढरपूर राज्य महामार्गाच्या कडेला 500 गुंठ्याच्या परिसरात लाखो रूपये गुंठ्याने परस्पर विक्री झाली आहे.
कोट्यवधी रुपयांचा हा एकूण घोटाळा असल्याचे त्यांनी सांगितले असून याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात आहे. या घोटाळ्याबाबतचे सर्व पुरावे निवेदनासोबत जोडले आहेत.
सदर गायरान जमिनीवर शासकीय घरकुलेही बांधली आहेत. तसेच या जागेत सामाजिक वनीकरणाने झाडे लावून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ती झाडे तोडूनच येथे अतिक्रमण झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात नेमके कोण दोषी आहेत, ते प्रशासन शोधून कारवाई करेल, मात्र गायरान या शासकीय जमिनीवर अतिक्रमण होतेच कसे, संबंधितांना ग्रामपंचायतीचा उतारा मिळतोच कसा, याचाही उलगडा होणे गरजेचे असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे.
या गायरान जमिनीत सामाजिक वनीकरण आटपाडी विभागाने 2019-20 ला 8 हजार 888 रोपे 8 हेक्टर क्षेत्रात लावली होती. ती रोपे लावून 31 मार्च 2022 ला ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली होती. आता ती पूर्णतः उखडली गेली आहेत. तसा पंचनामा वनक्षेत्रपाल चरापले यांनी केला आहे. यावर झालेला दहा लाखाचा खर्च वाया गेल्याची माहिती निवेदनात दिली आहे.
संबंधितानी माजी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना भेटून त्यांना येथील अतिक्रमणाची माहिती देऊन तक्रार दिली आहे. येथील गायरान जमीन गट क्रमांक 768,771 तसेच 1648 मधील 769 गटात ही अतिक्रमणे आजही मितीस चालू असल्याचे त्यांना सांगितले आहे. तसेच चालू अधिवेशनात यासंबंधी लक्षवेधी मांडू, असे आश्वासनही आमदार जयंतराव पाटील यांनी दिले होते. त्यांनी हा विषय विधानसभेत उपस्थितही केला.ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्गालगत गायरान जमीन आहे, त्याची किंमत कोट्यवधी रूपये आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकार्यांनी या जमिनीचे प्लॉट पाडून विक्री सुरू केली आहे. वनभागाची झाडे काढली आणि प्लॉट विकण्याचा कार्यक्रम केला. जिल्हाधिकार्यांशी मी बोललो, त्यांनी ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. आता ग्रामसेवक म्हणतोय मला पोलिस संरक्षण द्या, मी अतिक्रमणे काढतो. धनदांडग्यांना जमिनी दिल्यात. 40 पैकी 30 एकरात प्लॉट पाडून विक्री केलीय.