सांगली : अखेर मान्सूनचे बुधवारी सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आगमन झाले. शहरात दिवसभर पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे. सांगली शहराबरोबरच शिराळा, मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, आटपाडी आणि पलूस तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेतीच्या प्राथमिक मशागतीसाठी उपयुक्त असला, तरी पेरणीसाठी अजून पुरेसा नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २९.१ मि.मी. पाऊस पडला. विविध धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये) असा आहे : कोयना धरणातून ५२५, कण्हेर ४०, वारणा २००, राधानगरी २००, हिप्परगी बॅरेज २५० आणि अलमट्टी धरणातून ८६८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णा व वारणा नदीवरील विविध पुलांच्या ठिकाणी आजची पाण्याची पातळी आणि कंसात इशारा पातळी (फुटांमध्ये) पुढीलप्रमाणे आहे : आयर्विन पूल सांगली ७.३ (४०) आणि अंकली पूल हरिपूर २.०८ (४५.११).
वारणा धरणात ११.२८ टीएमसी पाणीसाठा
जिल्ह्यातील वारणा धरणात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ११.२८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून, या धरणाची एकूण साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. कृष्णा खोऱ्यातील विविध धरणांमधील आजचा प्रत्यक्ष पाणीसाठा आणि कंसात त्यांची एकूण साठवण क्षमता (टीएमसीमध्ये) पुढीलप्रमाणे आहे : कोयना १३.९७ (१०५.२५), धोम ३.७७ (१३.५०), कण्हेर ३.३४ (१०.१०), वारणा ११.२८ (३४.४०), राधानगरी १.८४ (८.३६), हिप्परगी बॅरेज ०.८२ आणि अलमट्टी २१.४१ (१२३).