जत; पुढारी वृत्तसेवा : जतेत ओबीसींच्या आरक्षणासाठी आज (दि. ७) सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून महाराणा प्रताप चौक, गांधी चौक संभाजी चौक मार्गे तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात ओबीसीचे राज्याचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, शंकरराव लिंगे, डीपीआयचे अध्यक्ष सुकुमार कांबळे, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, लक्ष्मण हाके, लोकमत पतसंस्थेचे संस्थापक शंकरराव वगरे,अशोक बनेनवार,सरदार पाटील तुकाराम माळी, सरदार पाटील ,महादेव पाटील, सलीम गवंडी, संजय कांबळे, बंडू डोंबाळे, विक्रम ढोणे, आरक्षणासंदर्भात आपली मते व्यक्त केली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, रमेश पाटील, आकाराम मासाळ, परशुराम मोरे सलीम पाच्छपुरे, सामजिक अशोक बनेनवार, यांच्यासह असंख्य ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोरील प्राणांगणात सभेत झाले. यावेळी ओबीसी नेत्यांनी आपल्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज गप्प बसणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे ,नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. शासन दरबारी आपल्या मागण्या पोहोच करू असेही सांगितले.
धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी.ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये.बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत.खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी सरकारने काढलेला जीआर रद्द करावा. अश्या मागण्या करण्यात आल्या.