आटपाडी : आटपाडी तालुक्यात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आटपाडी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून तिघा फरार संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये वर्षा संभाजी शेवाळे ऊर्फ बेगम दस्तगीर शेख (24, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा), सचिन हणमंत बाबर (46, रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा), अश्विनी संदीप जाधव (43, रा. मोळ्याचा ओढा, सातारा) यांचा समावेश आहे, तर संतोष सदाशिव कुलकर्णी (रा. कडेगाव), गणपत गोविंद जाधव (रा. करांडेवाडी, ता. कडेगाव) आणि शकुंतला गरुड (रा. कडेगाव) या तीन फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
फिर्यादी नवनाथ देशमुख (38, रा. देशमुखवाडी, आटपाडी) यांचा संशयित वर्षा शेवाळे हिची एजंटच्या माध्यमातून ओळख करून देऊन विवाह लावून देण्यात आला होता. यासाठी एजंट सचिन बाबर याने 21 हजार रुपये घेतले होते. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री वर्षा घरातून फरार झाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
तपासादरम्यान वर्षा शेवाळे आणि तिच्या साथीदारांनी संगनमताने विविध ठिकाणी विवाह लावून आर्थिक फसवणुकीचे रॅकेटच उभे केल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने वर्षा शेवाळे हिला कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सोने-चांदीचे दागिने आणि 1 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे आणखी एका व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून वर्षा शेवाळे हिला जेरबंद केले.