सांगली : सांगलीतील वर्दळीच्या हायस्कूल रोडवरील महाराजा चौकात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीमधून गेल्या गळती सुरू आहे. गेल्या तीन वर्षात अनेकवेळा काम करूनही गळती निघाली नाही. याबाबत परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु ‘या कामासाठी निधी नाही’, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. याप्रश्नी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे.
महाराजा चौकातील मुख्य जलवाहिनीच्या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. महापालिकेचे कर्मचारी येतात, खड्डा खणतात, थोडीफार दुरुस्ती करतात आणि काही दिवसांत पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. दुरुस्तीच्या नावाखाली काढलेला भला मोठा खड्डा आता अपघातांना निमंत्रण देत आहे.
रस्ता जलमय, व्यवसायावर परिणाम
सततच्या गळतीमुळे या भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने ग्राहकांना दुकानात येणे कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. तसेच, पाण्याचा दाब कमी झाल्याने परिसरातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाला वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष केले जात आहे. जर येथील गळती कायमस्वरूपी काढली नाही, तर सर्व व्यापारी एकत्र येऊन महापालिकेवर मोर्चा काढतील, असा इशारा परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी दिला आहे.