सांगली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यात लोकसभेची एक व विधानसभेची एक जागा वाढणार आहे. पुढील निवडणुकीत 33 टक्के महिला आरक्षणही असेल. त्यावर लक्ष ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे. भारताला जगात नंबर वन होण्यासाठी 2047 पर्यंत भाजपच सत्तेत हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगली केले.
येथील खरे सांस्कृतिक भवनमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त मेळावा झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आ. भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, राहुल महाडिक, महापालिकेचे सभागृह नेते संदीप आवटी, डॉ. रवींद्र आरळी प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी भाजपच्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, दर वीस वर्षांनी लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होते. विधानसभेचे 288 ऐवजी आता सुमारे 350 मतदारसंघ असतील. लोकसभेचे मतदारसंघ 543 वरून 650 होतील. पुनर्रचनेत जिल्ह्यात लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे 8 ऐवजी 9 मतदारसंघ असतील. कार्यक्रमाला चारपैकी एकच आमदार उपस्थित होते. भाजपमधील एका गटाचा जणू बहिष्कार होता. अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यही उपस्थित नव्हते. त्यावरून पदाधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली.