ईश्वरपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील उसाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाने तपासणी केल्यानंतर या बिबट्याचा मृत्यू वयोमानामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
कापूसखेडचे शेतकरी संभाजी तुकाराम पाटील यांच्या उसाच्या शेतातून गेल्या चार-पाच दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत होती. पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसपाटील प्रदीप बल्लाळ आणि वन विभागाला देण्यात आली.
सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गौते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, शिराळा वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर वन विभागाचे वनपाल दादासाहेब बर्गे, वनरक्षक अमोल साठे, बावचीचे वनरक्षक भीवा कोळेकर, हणमंत पाटील तसेच वनमजूर व रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रीतसर पंचनामा केला. यानंतर पशुसंवर्धन सहा. आयुक्त डॉ. अंजली खळीकर यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते.