कुपवाड : शहरातील मिरज रस्त्यावरील ओढ्यावर असलेल्या जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हजारो लिटर पाणी वाया गेले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कुपवाड ते मिरज रस्त्यावरील ओढ्यावर असलेल्या जलवाहिनीला मंगळवारी सकाळी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. गेल्या काही दिवसांपासून या जलवाहिनीला लहान गळती होती. त्यामुळे दररोज ओढ्यावरील रस्ता पाण्याखाली जात होता. या घटनेची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाला कशी काय नव्हती? मंगळवारी सकाळी अचानक मोठी गळती सुरू झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. वाया गेलेल्या पाण्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन लहान गळती लागलीच काढली असती, तर पाणी वाया गेले नसते, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.