सांगली : गेल्या आठ ते दहा दिवसापासून कृष्णा नदीपात्रातील वाहते पाणी थांबल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. पाण्याला हिरवा रंग आला असून, दुर्गंधी पसरली आहे.
कृष्णा नदीपात्रात आयर्विन पुलाजवळ पाच ते सहा फूटच पाणी आहे. वाहते पाणी थांबल्यामुळे साठलेल्या पाण्याला हिरवा रंग आला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. दूषित पाण्यामध्येच मूर्ती विसर्जन सुरू असल्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
नदीपात्रात विसर्जन न करण्याचे आवाहन
नदीपात्रात सध्या अत्यंत अल्प पाणीसाठा आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर ते सांगलीपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे भाविकांनी नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.