Grape Farm Damage Hailstorm
विटा : खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे हंगामी द्राक्ष पिकाची अक्षरशः माती झाली आहे.
खानापूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गुरुवारी (दि.१९) अवकाळी पाऊस पडला. सोसाट्याचा वारा आणि गारपीट मिश्रित पाऊस यामुळे हाता तोंडाला आलेल्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी पावणेदोन च्या स्वरूपात सुरू झालेला पाऊस पावणेचार वाजेपर्यंत सुरू होता.
आज दुपारी बारा वाजल्यानंतरच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते अचानक हवेत गारवा निर्माण झाला आणि लगोलग मोठ्या गारा पडू लागल्या. बघता बघता शेतात, रस्त्यांवर, घरांवर, छपरांवर गारा पडू लागल्या. छोट्या बोरा एवढ्या पडलेल्या गारपिटीमुळे हातात तोंडाशी आलेली द्राक्षे अक्षरशः सडा मारतात त्याप्रमाणे जमिनीवर खाली पडली.
यामध्ये खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावरील करंजे, हिवरे,पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी वगैरे निर्यात क्षमुद्राक्ष पिकवणाऱ्या भागातल्या द्राक्ष बागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.