आमदार सुहास बाबर File Photo
सांगली

MLA Suhas Babar | खानापूर-आटपाडीसाठी टेंभू योजना तातडीने सुरू करा : आमदार सुहास बाबर

आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Tembhu Yojana Sangli

विटा : खानापूर-आटपाडी या दुष्काळग्रस्त मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाईची गंभीरता लक्षात घेऊन टेंभू उपसा सिंचन योजना तातडीने कार्यान्वित करावी तसेच या योजनेद्वारे मतदारसंघातील सर्व लघू पाटबंधारे तलाव, बंधारे आणि जलसाठे भरून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार बाबर यांनी नमूद केले आहे की, खानापूर आणि आटपाडी हे तालुके कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यात मोडतात. सध्या परिसरातील बहुतांश लघू पाटबंधारे तलाव आणि बंधाऱ्यांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, कोयना धरण परिसर आणि कृष्णा नदी खोऱ्यात सध्या समाधानकारक पाऊस होत असला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार 'अल निनो'च्या प्रभावामुळे खानापूर-आटपाडी भागात अपेक्षित पाऊस होईल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर टेंभू उपसा सिंचन योजना या भागासाठी जीवनदायी ठरत असून, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळग्रस्त भागातील सर्व लघू पाटबंधारे तलाव, बंधारे आणि जलसाठे तातडीने भरून घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार बाबर यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या मागणीच्या पत्राच्या प्रती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT