संजय खंबाळे
कवठेपिरान : कवठेपिरान (ता. मिरज) येथील मुख्य बसस्थानकापासून ते हिंदकेसरी हायस्कूलपर्यंतचा रस्ता सध्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून, दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. किरकोळ व गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
गेल्याच आठवड्यात एका तरुणास मोटारीने धडक दिली. यामध्ये जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. त्यापूर्वी सुमारे दीड-दोन महिन्यांपूर्वी भरधाव दुचाकीने एका महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित महिलेचाही मृत्यू झाला. चार-पाच महिन्यांपूर्वी हायस्कूल रोडवर रात्री शतपावली करणाऱ्या तरुणाला दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली होती. या अपघातात तो जखमी झाला होता. या प्रमुख घटनांव्यतिरिक्त दुचाकी, चारचाकी वाहनांच्या धडकेत किरकोळ जखमी होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, अपघातांची मालिका सुरू असूनही या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
शाळकरी मुले, ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला आणि पादचाऱ्यांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यातच भरधाव वाहने आणि दुचाकीस्वारांमुळे धोका अधिक वाढला आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.