कासेगाव : शेणे (ता. वाळवा) येथील राजवीर पोल्ट्री फार्ममध्ये अतिउष्माघातामुळे तब्बल 600 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीजपुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांकडून होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांनी तत्काळ राजवीर पोल्ट्री फार्मला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मृत झालेल्या पक्ष्यांची पाहणी करून त्यांनी पोल्ट्री मालक व स्थानिकांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. यानंतर आमदार देशमुख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळीच जाब विचारत नाराजी व्यक्त केली. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा आवश्यक असताना झालेल्या निष्काळजीपणामुळे शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पोल्ट्री फार्मचे मालक
डॉ. गणेश पाटील, तसेच सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, युवानेते सुजित पाटील, हेमंत मुळीक, राजाराम पाटील, माजी उपसरपंच सदाशिव पाटील, मिलिंद पाटील आणि सर्जेराव पाटील उपस्थित होते.