कवठेमहांकाळ ः शहरासाठी जीवनवाहिनी ठरणारी आणि अत्यंत महत्त्वाची असलेली बंडगरवाडी पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी या योजनेची यशस्वी चाचणी करण्यात आली. सुमारे 60 कोटी रुपयांच्या या बहुप्रतिक्षित प्रकल्पामुळे शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीवर मतदारांनी विश्वास दाखवल्यानंतर, शहरातील तीव्र पाणीटंचाईची समस्या ओळखून माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली होती. या योजनेसाठी आवश्यक निधी आणि मंजुरी मिळवण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला. माजी नगराध्यक्षा अश्विनी पाटील यांनीही या योजनेच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले होते. अनेक वर्षांपासून कवठेमहांकाळमधील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या योजनेअंतर्गत नवीन विहीर आणि जलसाठा टाकीचे बांधकाम, मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम, घरगुती नळजोडणीची कामे पूर्ण करण्यात आली.