वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यावर गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी सभासदांचे ठिय्या आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, दुसरीकडे कारखान्याचा प्रशासकीय कारभार अधिकारी, कर्मचारी आणि संचालकांच्या माध्यमातून सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, अडचणीत सापडलेल्या या कारखान्यासाठी हे आंदोलन नवसंजीवनी ठरणार का, याबाबत आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याने सहकारी साखर उद्योगात एक सुवर्ण इतिहास निर्माण केला होता. हुतात्मा पॅटर्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कारखान्याने सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे नागनाथअण्णा हीच या कारखान्याची खरी ताकद मानली जात होती.
नागनाथअण्णांनी सरकार-विरोधात अनेक लढे उभारून आणि आयकर आंदोलनासारख्या चळवळींच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारी वाचविण्याचे मोठे काम केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील सर्वाधिक दर आणि कामगारांना 50 टक्के बोनस देण्याचा ऐतिहासिक विक्रमही हुतात्माने प्रस्थापित केला होता. मात्र, आज बदललेल्या परिस्थितीमुळे तो साखर उतारा कुठे गेला आणि देदीप्यमान हुतात्मा पॅटर्न का बदलला, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.