वाळवा ः हुतात्मा साखर कारखाना पुढील काळात सर्व संचालक, अधिकारी, सभासद, शेतकरी सर्वांनी मिळून चालवावा लागणार असून ज्या पद्धतीने क्रांतिवीर नागनाथअण्णा यांनी साऱ्या महाराष्ट्राला हुतात्मा पॅटर्न दाखवून दिला, तोच आव्हान समजून दाखवावा लागेल, त्यासाठी सर्वांनी तयार राहावे, असे आवाहन गौरव नायकवडी यांनी वाळवा येथे केले.
20 व्या दिवशी हुतात्मा साखर कारखान्यासमोर सभासद, शेतकरी, आंदोलक नेते किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा आणि कारखान्यावरील कर्ज भागवावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलनास बसले आहेत. नायकवडी म्हणाले, गेली 20 वर्षे वैभवकाका यांनी प्रत्येक गोष्टीत पैसे खाण्याचे काम केले. त्यांनी कारखान्याचे हित अजिबात पाहिले नाही. त्यामुळे हुतात्मा पॅटर्न अक्षरशः मोडीत काढला. साखरपोती चोरीमुळे शेतकरी, सभासद, ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार कोणत्याच घटकाला आर्थिक न्याय मिळाला नाही. बझारच्या माध्यमातून कारखान्याची प्रचंड आर्थिक लूट करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला स्वतःची खासगी कंपनी काढून बझारच्या साहाय्याने साखर खरेदी करून केलेली लूट वेगळीच आहे. आता पुन्हा हुतात्मा पॅटर्न उभा करावा लागणार आहे.
किरण नायकवडी म्हणाले, वेळेत आपण सावध झालो म्हणून बरे झाले. नाही तर वैभवने लवकरच कारखाना हुतात्मा केला असता, तो भंगारात काढावा लागला असता. केदार नायकवडी म्हणाले, पैसे मिळवण्यासाठी काकांनी गुणवत्तेच्या मालाला, यंत्रांना अजिबात किंमत दिली नाही. त्यामुळे बरीच यंत्रणा बदलावी लागणार आहे. साखर चोरीची तक्रार दाखल झाली आहे, त्याची कारवाई सुरू झाली आहे.