सांगली: सांगली शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. शिराळा पश्चिम भागात चांदोली धरण व अभयारण्य परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी केल्याने एका बाजूला शहरातील सखल भागांत पाणी साचून जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असले, तरी ग्रामीण भागात मात्र कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे सांगली आणि मिरज शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक संथ गतीने सुरू असून व्यापाऱ्यांची काहीशी तारांबळ उडाली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागासाठी हा पाऊस 'अमृतधारा' ठरला असून यामुळे सुकू लागलेल्या खरीप पिकांना नवजीवन लाभले आहे. दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून सध्या धरणात ५.०९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यानुसार धरण १८.५० टक्के भरले आहे.