ऐतवडे बुद्रुक : वारणा पट्ट्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. दुसऱ्या बाजूला हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. शेतकरी वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून आहेत. वाढत्या उष्मामुळे जनावरांची विशेष काळजी शेतकरी घेत आहेत.
जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागाचा कणा आहे. याने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळते. जनावरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी दूध संघ, गावां-गावातल्या दूध संस्था औषधांची उपलब्धता करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यावरील छतावर नारळीच्या झावळ्या, उसाचा पाला टाकला जात आहे.
उन्हाची तीव्रता, पाण्याची कमतरता, चारा टंचाईमुळे कमी दराने जनावरे विकली जात आहेत. चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. नळपाणी योजनेत जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे.- सचिन पाटील, शेतकरी, ऐतवडे बुद्रुक