सांगली : सांगली-हरिपूर रस्त्याचे काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. ही गळती थांबवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी दिल्या, तसेच येथील नूतन नगरसेवकांनादेखील भेटून तक्रार दिली. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने आवाज उठवला असता तत्काळ काम सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवकांनीही दोन दिवसात काम पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन दिले.
दै. ‘पुढारी’च्या वृत्ताने कामाला गती मिळाली आहे. गळती थांबवणे, पाणी पुरवठा सुरूळीत करणे व रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. वाहतूक कोंडी रोजच होत असल्याने गळती काढण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. रात्रीच्यावेळी खड्ड्याजवळून जाताना वाहनधारकांची तारांबळ उडते. त्यामुळे अपघात होऊ नये, यासाठी बाजूने सुरक्षित मार्ग द्यावा, तसेच खड्ड्याजवळ वाहनधारकांसाठी खबरदारी घेण्याबाबत सूचना फलक लावावा, अशी मागणी होत आहे. याचप्रमाणे रस्त्याचे काम गतीने, वेळेत आणि दर्जेदार करावे, अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे.