आटपाडी : घरनिकी (ता. आटपाडी) येथील तरुणाच्या खूनप्रकरणानंतर मोबाईल बंद करून पोलिसांच्या नजरेतून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अखेर आटपाडी पोलिसांनी बिहारमध्ये जेरबंद केले. अनिलकुमार श्रीराम साह (वय २०, रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा शोध घेत पोलिसांनी पुणे, गाझियाबाद आणि त्यानंतर थेट बिहार गाठत त्याच्या मुसक्या आवळल्या.
घरनिकी येथे २ सप्टेंबर रोजी रात्री सकिंदरकुमार साहनी हे खोलीत झोपले असताना त्यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करण्यात आला होता. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून अनिलकुमार साह याने हा हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. गंभीर जखमी साहनी यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ६ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले.
दरम्यान, घटनेनंतर संशयिताने मोबाईल बंद करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासातून त्याने एका मित्राशी संपर्क साधल्याचे समोर आले. या धाग्यावरून तपास पथकाने त्याचा माग काढत गाझियाबाद गाठले. तेथे तो पोलिसांच्या हातातून निसटला. त्यानंतर तो बिहारमधील बरियारपूर येथे परतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता थेट बिहार गाठले. १३ सप्टेंबर रोजी बरियारपूर येथे संशयिताला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.