सांगली : जिल्ह्याचा जीडीपी 1 लाख 77 हजार कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, डीपीसीतील 252 कोटी रुपये निधी विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलिस कवायत मैदान, विश्रामबाग येथे आयोजित या कार्यक्रमास महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त संजीता महापात्र, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, उपवनसंरक्षक सागर गवते, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सन 2030 पर्यंत जिल्ह्याचा जीडीपी 1 लाख 77 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजनमधील 25 टक्के निधी या धोरणात्मक कामांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गत आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेचा 545 कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी 185 कोटी रुपये जिल्हा धोरणात्मक आराखड्यातील कामांसाठी वापरण्यात आले. चालू वर्षातही 589 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून 252 कोटी रुपये विकास आराखड्यावर खर्च करण्याचे नियोजन आहे. त्यातून जिल्ह्याचा संतुलित आणि चौफेर विकास करण्यात येत आहे.
प्रारंभी पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले. संचलनात पोलिस, पोलिस बँड, श्वान, निर्भया, बाँबशोधक व बाँबनाशक पथक, शीघ्र प्रतिसाद दल, मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन, अग्निशमन, दंगल नियंत्रक आदी पथकांचा समावेश होता. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, नागरिकांचा सत्कार करण्यात आला.