सांगली : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ या जयघोषात दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पाला भाविकांनी जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. मंगळवारी शहरातील सुमारे चारशेहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचे कृष्णा नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. तसेच ६० गणपतींचे महापालिकेच्या कृष्णामाई जलकुंडात विसर्जन करण्यात आले, तर १० घरगुती गणेश मूर्ती दान करण्यात आल्या.
मंगळवारी पहाटेपासूनच सरकारी घाट आणि स्वामी समर्थ घाटावर भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी विधीवत पूजा, आरती ओवाळून व नैवेद्य दाखवून बाप्पाला निरोप दिला. काही भाविकांनी नावेतून कृष्णा नदीत जाऊन मूर्तींचे विसर्जन केले. या वेळी ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
महापालिकेच्या वतीने नदीकाठी विसर्जनासाठी जलकुंड, निर्माल्य कुंड आणि मूर्तीदान केंद्र उभारण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अग्निशामक दलाचे १२ जवान चोवीस तास तैनात करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्तींच्या विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती.