तासगाव : रस्त्याकडेला थांबलेल्या पिकअपला दुचाकीची मागून धडक बसून चिमुरडीसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. सागर बाबुराव जाधव (वय ३७), त्यांची मुलगी हर्षिता सागर जाधव (वय ५, दोघेही रा. सरस्वतीनगर, वासुंबे, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत. आई सोनाली गंभीर जखमी आहे.
तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर वासुंबे हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिराजवळ बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सोनाली यांच्या डोक्याला मार लागला आहे. सागर जाधव हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बाबुराव जाधव यांचा मुलगा. त्यांच्या पत्नी सोनाली शहरातील मणेराजुरी रस्ता येथे असणाऱ्या एका शाळेत शिक्षिका आहेत.
पत्नीला आणण्यासाठी सागर त्यांच्या हर्षिता या मुलीला घेऊन दुचाकी (एमएच १० सीएफ ३८६४) वरून गेले होते. शाळेतून येत असताना वासुंबे हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिराजवळ रस्त्याकडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला (एमएच ०९ सीए ९४७८) त्यांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की सागर आणि हर्षिता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. सर्वांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. सोनाली यांना तातडीने मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.