आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडी येथे जुन्या वादाच्या कारणावरून शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर सहा जणांनी संगनमताने हल्ला केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी दि. ५ सप्टेंबर रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सोन्याबापू कापडे (वय ३७, रा. पारेकरवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वैभव मनोहर पारेकर, दीपक दादा पारेकर, तायाप्पा यशवंत पारेकर, सनी संपत पारेकर, दिनेश नानासोा तरसे आणि सुरेश शामराव पारेकर (सर्व रा. पारेकरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला होता. याच वादाच्या कारणावरून ३१ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास पाटील मळा (बाळू मामा मंदिराजवळ), पारेकरवाडी येथे फिर्यादी शेतात काम करीत असताना आरोपी तेथे आले. ‘२८ ऑगस्ट रोजी आमच्यासोबत वादावादी का केली?’ असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. यावेळी वैभव मनोहर पारेकर याने तेथे पडलेली काठी हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच अन्य चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी दीपक कापडे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.