ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील डोंगरवाडीच्या डोंगरात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून पंचायत वन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रेरणादायी ठरत आहे. एक हेक्टर क्षेत्रामध्ये शंभर रोपांचे एक वर्षापूर्वी रोपण केले होते. आज सर्व वृक्ष डोलदारपणे डोलत आहेत.
प्रदूषण मुक्त व स्वास्थ्यपूर्ण जीवन पंचायत वनाच्या माध्यमातून अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने राबवला आहे. यामध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुलिंब व देशी आंबा या औषध गुणधर्म असणार्या, दाट सावली देणार्या वृक्षांच्या लागवडीस प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायूची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. नागरिकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य रोग प्रतिकार क्षमता वाढेल. व जनसामान्यास सुख, शांती व समृद्धी मिळेल. अशा पद्धतीचे पंचायत वन तालुक्यातल्या अनेक ग्रामपंचायतीने राबवावे, असे आवाहन निसर्गप्रेमी कुमार गायकवाड यांनी केले.
वारणा पट्ट्यातल्या शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी तसेच विद्यार्थ्यांनी ‘एक झाड, एक विद्यार्थी’ या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांना झाडाचे पालकत्व द्यावे. त्यामुळे शाळेच्या मैदानामध्ये वृक्षांची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होईल.कुमार गायकवाड, वनप्रेमी ऐतवडे बुद्रुक.