सांगली ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दहा तालुक्यांतील 1 हजार 150 पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ शिवपुरी (ता. वाळवा) येथील एकाच गावाचा पाण्याचा नमुना दूषित आढळल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही गावात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी होऊनही एकाच गावात दूषित पाणी सुरू असल्याचा अहवाल आल्याने पाणीपुरवठा ‘स्वच्छ’, की अहवाल स्वच्छ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्रांच्या मदतीने गावातील पाणीपुरवठा स््राोतांचे नमुने दर महिन्याला घेतले जातात. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. तपासणीनंतरचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला जातो. दूषित नमुने आढळल्यास संबंधित पाणी स््राोतांचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया राबवली जाते. एप्रिल महिन्यात दहा तालुक्यांतील विविध गावांमधून पाण्याचे नमुने घेण्यात आले.
त्यामध्ये आटपाडी - 106, जत - 145, कवठेमहांकाळ - 88, मिरज - 112, तासगाव - 86, पलूस - 138, वाळवा - 188, शिराळा - 118, खानापूर - 84 आणि कडेगाव - 85, असे एकूण 1150 नमुने तपासण्यात आले. मात्र यामध्ये फक्त शिवपुरी (ता. वाळवा) येथील नमुना दूषित आढळला आहे. त्यामुळे आश्यर्च व्यक्त होत आहे. तपासणी करणारी यंत्रणा वगळून विशेष पथकाच्यावतीने काही गावांत अचानक भेटी देऊन पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करावी. पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून झाडाझडती घेण्याची मागणी होत आहे.
अहवाल आलबेल; तपासणीचीच ‘तपासणी’ हवी
जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळ पाणीपुरवठा होणे, अशा तक्रारी सातत्याने ऐकायला मिळतात. मात्र सरकारी अहवालात ‘सर्व काही आलबेल’ दाखवत आहे. त्यामुळे या पाणी तपासणीचीच ‘तपासणी’ करण्यासाठी आता पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.