सांगली : जिल्ह्यात शेतकर्यांना खरीप हंगामात शेती कर्ज पुरवठा करण्यासाठी 2 हजार 40 कोटी रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून जून अखेर 78 टक्के वाटप करण्यात आले आहे, तर व्यापारी बँकांनी केवळ 20, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी 37 टक्के वाटप केले आहे. त्यावरून व्यापारी व राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्यांना कर्ज देताना टाळाटाळ करताना दिसत आहेत.
यंदा मे महिन्यांपासून धुव्वांधार पावसाला सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात पेरणीची धांदल उडाली आहे. पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू असून त्यासाठी त्यांना जून महिन्यापूर्वीच पीककर्ज मिळणे गरजेचे असते. परंतु मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज आकारले जाते. हंगामासाठी जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले जात आहे.
जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी 1 हजार 148 कोटी 4 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. जूनअखेर जिल्ह्यातील 88 हजार 154 शेतकर्यांना तब्बल 801 कोटी 40 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टापैकी 70 टक्के वाटप या पहिल्या सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीतच पूर्ण झाले आहे.
ऊस पिकांसाठी सर्वाधिक 50 हजार 384 शेतकर्यांना 445 कोटी 9 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. सोयाबीनसाठी 6 हजार वीस शेतकर्यांना 2 कोटी 16 लाख, डाळिंब 6 हजार 82 शेतकर्यांना 6 कोटी 18 लाख, द्राक्षांसाठी दहा हजार 30 शेतकर्यांना 217 कोटी 97 लाख, कापसासाठी 11 हजार 647 शेतकर्यांना 3 कोटी 96 लाख, याशिवाय इतर पिकांसाठी एक हजार 16 शेतकर्यांना 6 कोटी 82 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी सांगितले.
पीक शेतकरी रक्कम
ऊस 50,384 445 कोटी 9 लाख
द्राक्ष 10030 217 कोटी 97 लाख डाळिंब 6082 6 कोटी 18 लाख
सोयाबीन 6020 2 कोटी 16 लाख
कापूस 11,647 3 कोटी 96 लाख
इतर पिके 1016 6 कोटी 82 लाख