Sangli District Central Bank File Photo
सांगली

Sangli District Central Bank: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 65 हजार खातेदारांची रि-केवायसी पूर्ण

अजूनही पाच लाख खातेदारांची खाती गोठवलेलीच; तातडीने रि-केवायसी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा बॅँकेच्या सुमारे सहा लाख खातेदारांची बॅँक खाती रि-केवायसीसाठी गोठवण्यात आली होती. यातील 65 हजार 698 खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून रि-केवायसी केली. अजूनही सुमारे 5 लाख खातेदारांनी रि-केवायसी पूर्ण न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत. या खातेदारांनी बॅँकेशी संपर्क साधून रि-केवायसी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने रि-केवायसी नसलेली सुमारे सहा लाख खाती मागील आठवड्यात गोठवली आहेत. बॅँकेने त्यापूर्वी आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व खातेदारांना रि-केवायसी करण्याचे आवाहन वारंवार केले होते. मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बँकेला खातेदारांची रि-केवायसी करत नसल्याने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. राज्यातील अन्य बँकांवर अशा प्रकाराची कारवाई आरबीआय केली आहे. यामुळे जिल्हा बॅँक प्रशासनाने तातडीने सुमारे सहा लाख खातेदारांना रि-केवायसी करावी, असे मेसेज पाठवले. तसेच यासाठी त्यांची खाती गोठवण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली. मात्र बॅँकेने आरबीआयच्या आदेशानुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खातेदारांनी रि-केवायसीसाठी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मोठी गर्दी होती.

खातेदारांच्या रि-केवायसीसाठी जिल्हा बॅँकेने शनिवार व रविवारी सुटी दिवशीही बॅँकेचे कामकाज सुरू ठेवले होते. तसेच नियमित दिवशी कॅश काढण्यासाठी दोन तास मुदत वाढवून तीन 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात 6 लाख खातेदारांपैकी 65 हजार 698 जणांनी रि-केवायसी केली आहे. त्यांची खाती बॅँकेने पूर्ववत सुरू केली आहे. मात्र अद्यापही 5 लाख 35 हजार खातेदारांनी रि-केवायसी न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत.

ज्या खातेदारांनी रि-केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून रि-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच यासाठी मुदत असल्याने बँकेत गर्दी न करता ज्यांना तातडीने खात्यातील पैसे काढायचे आहे किंवा अन्य बॅँकिंग व्यवहार करायचा आहे, तसेच ज्यांच्या खात्यावर शासन अनुदान, मदत जमा होणार आहे, अशा खातेदारांनी आधी रि-केवायसी पूर्ण करावी व खाती सुरू करून घ्यावीत. यानंतर अन्य खातेदारांनी आपली खाती सरू करून घ्यावीत. मात्र रि-केवायसी केल्याशिवाय गोठवलेली खाती पूर्ववत सुरू होणार नाहीत.
शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT