सांगली : शेतकर्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्या जिल्हा बॅँकेतील सात कर्मचार्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे. या सात कर्मचार्यांनी मिळून विविध शाखांमध्ये 2 कोटी 11 लाख 60 हजार 824 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अपहारप्रकरणी अजून 18 कर्मचार्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू असून त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचार्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा बसर्गी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केट यार्ड तासगाव), बाळासाो नारायण सावंत (औ. वसाहत पलूस), प्रताप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे व दिगंबर पोपट शिंदे (शाखा नेलकरंजी) या कर्मचार्यांचा समावेश आहे.
शासनाकडून वेळोवेळी शेतकर्यांना भरपाई, अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. जिल्हा बॅँकेत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकर्यांची सदर मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या रकमेत बॅँकेच्या काही शाखांमध्ये कर्मचार्यांनीच अपहार केल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या आहेत. वास्ताविक हा अपहारही चार ते पाच वर्षापूर्वी झाला आहे. मात्र बॅँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बॅँकेच्या सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरू केल्याने त्यात हे घोटाळे पहिल्यांदा उघडकीस आले. शाखाधिकारी व लिपिक, काही ठिकाणी शिपाई यांनी संगनमताने शेतकर्यांच्या मदतीवर डल्ला मारला आहे.