सांगली : जिल्हा बँकेच्या शिपाई पद भरती लेखी परीक्षेबाबत गंभीर तक्रारी आल्याने संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीचा अंतिम निकाल जाहीर करू नये, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, सहकार विभाग आणि अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, बँकेच्या ७९ जागांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेस ३ हजार ७३३ उमेदवार उपस्थित होते. परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका व ओएमआर उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली नाही. तक्रारींच्या सत्यतेसाठी उमेदवारांचे जबाब नोंदवून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करावी. उत्तरपत्रिकांचे सीलिंग, वाहतूक, स्कॅनिंग आणि मूल्यमापनाच्या सुरक्षेची चौकशी व्हावी.
परीक्षा घेणाऱ्या एजन्सीची नियुक्ती, तिची पात्रता आणि सुरक्षा प्रोटोकॉल तपासावा. मुलाखतीसाठी ठेवलेल्या ३० गुणांच्या तरतुदीबाबतचा शासन निर्णय, भरती धोरण व बँकेचा ठराव सार्वजनिक करावा. प्राथमिक उत्तरतालिका प्रसिद्ध करून हरकती मागवाव्या. अनियमितता सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करून स्वतंत्र संस्थेमार्फत फेरपरीक्षा घ्यावी. याबाबत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले, आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. शासनमान्यता व नियमांनुसारच ही भरती होत आहे.