सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल बाहेर येईल. संचालक दोषी नाहीत, मग उच्च न्यायालयात जाण्याची गरज काय होती. चौकशीला घाबरल्याने संचालक न्यायालयात गेल्याची टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर आ. पडळकर गुरुवारी बोलत होते. जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे. मात्र संचालकांनी मनमानी कारभार केला आहे. आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जात असून त्याचा अहवाल लवकरच येईल. बँकेतून कारखान्यांना टक्केवारीने कर्ज दिले जाते. कर्नाटकसह कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना कर्ज देण्यात आले. खासदार विशाल पाटील यांच्या कारखान्याला कोणत्या नियमाने कर्ज देण्यात आले, याचा खुलासा करावा. मिडल ईस्ट इंडिया प्रोजेक्ट हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून न घेता समुद्रातून पाईपलाईन आणण्याच्या वक्तव्यावरून मला ट्रोल केले जाते. याच्यामागे जयंत पाटील यांचे डोके आहे. सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून मला ट्रोलिंग केले जात आहे.