आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथील साळशिंग मळा परिसरात एमएसईबी कार्यालयाजवळ ११ जुलै रोजी झालेल्या अपघातप्रकरणी मोटार चालकाविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी विशाल पोपट मंडले (वय २१, रा. माडगुळे, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारचालक अनिल राजाराम सरतापे (रा. दिघंची, ता. आटपाडी) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास विशाल मंडले, सौरभ हणमंत वाघमारे, आदित्य विनायक जावीर आणि दत्तात्रय हणमंत चव्हाण हे चौघे दुचाकीवरून आटपाडीहून पुजारवाडी येथे पोल उभारणीच्या कामासाठी जात होते. यावेळी सौरभ वाघमारे हे दुचाकी चालवत होते.
हे चौघे दिघंची येथील एमएसईबी कार्यालयाजवळील साळशींग मळा परिसरात पोहोचले असता, समोरून येणारी मोटार (क्र. एमएच १० ईके ७८५२) भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने आली. तिने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकीचालक सौरभ हणमंत वाघमारे (रा. आटपाडी) आणि आदित्य विनायक जावीर (रा. माडगुळे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल मंडले आणि दत्तात्रय हणमंत चव्हाण हे गंभीर जखमी झाले. आटपाडी पोलिसांनी मोटार चालक अनिल सरतापे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.