ईश्वरपूर : एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेल्या 'स्मार्टकार्ड'साठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, तसेच या कार्ड वितरण प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी वाळवा तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीने महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अजूनही ५५ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी हे स्मार्ट कार्ड काढलेले नाही. त्यामुळे कार्ड काढण्याची मुदत आणखी दोन महिने वाढवण्यात यावी. तसेच हे कार्ड काढताना नागरिकांना ऑनलाइन पैसे भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कार्ड वितरण आणि नोंदणीच्या पद्धतीत आवश्यक बदल करून सुलभता आणावी. हे निवेदन देताना समितीचे अध्यक्ष प्राचार्य डी. के. पाटील, खजिनदार शिवाजी पाटील, सचिव आर. ए. देसाई, उपाध्यक्ष शिणगारे, भानुदास जाधव, सुभाष पाटील, भगवान पाटील यांच्यासह अन्य सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.