सांगली : अभयनगर येथे वेदांत मारुती बंडगर याच्यावर पिस्तूलमधून गोळ्या झाडून केलेल्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नीलेश गडदे हा अद्यापही पसार आहे. पोलिस चार वेगवेगळ्या पथकांच्या साहाय्याने त्याचा विविध ठिकाणी शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित अतुल वायदंडे याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी काही संशयितांची नावे वाढण्याची शक्यता असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
१० जूनरोजी जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची एक घटना घडली होती. या प्रकरणात खरात हे दाद मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाळासाहेब बंडगर यांनी नीलेश गडदेविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून ११ जूनरोजी नीलेश गडदे याने वेदांत बंडगर याच्यावर पिस्तूलमधून गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केला. या घटनेनंतर तो तातडीने फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी नीलेश गडदेसह पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, शुक्रवारी अतुल वायदंडे याला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असून, विविध संघटनांचे पदाधिकारी व आमदार सदाभाऊ खोत यांनी, या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि दोषी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मुख्य संशयित आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.