जत : बाज येथील खंडणी, धमकी व गोळीबार प्रकरणानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या तोंडी आदेशानुसार त्यांची सांगली येथील पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. रविवारी सकाळी ते तेथे रुजू झाले.
आरग येथील रेल्वे मालधक्का ठेकेदारीच्या वादातून खंडणीची मागणी, त्यानंतर सांगलीत १४ वर्षांच्या मुलाची हत्या... या घटनांमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात सराईत गुन्हेगार नीलेश गडदे याने पोलिस ठाण्यासमोरच रिव्हॉल्व्हर काढून जमावाला धमकावल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर संजयनगर येथे केलेल्या गोळीबारात १४ वर्षीय वेदांत बंडगर या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला होता.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल होण्यास झालेला विलंब, राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना आलेले उधाण आणि संशयित आरोपीविरुद्ध वेळेत प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्याबद्दल विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून जत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटकाव करण्यात आला असता, तर पुढील घटना टाळता आली असती, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.