सांगली : दरमहा चार टक्के परतावा देण्याच्या आमिषाने सांगलीतील एकाला तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुधीर धोंडिराम चंदुरे यांनी सहा जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर (दोघे रा. रत्नागिरी), किरण वसंत कुंडले, चेतन खोत, महेश झाडबुके आणि स्नेहा खोत (चौघे रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
मुख्य संशयित समीर नार्वेकर याने सांगलीतील साथीदारांच्या मदतीने 'टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि.' नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास ४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरुवातीला काही जणांना परतावा देण्यातही आला. यामुळे विश्वास बसल्याने सुधीर चंदुरे यांनी या कंपनीत १ कोटी ३३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, जुलै २०२१ पासून त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही, तसेच त्यांची मूळ रक्कमही परत दिली गेली नाही.
चंदुरे यांनी रकमेची मागणी केली असता संशयितांनी ती देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चंदुरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.