जत : बाज (ता. जत) येथे सांगली रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावरील काम सोड, अन्यथा मला १० लाख रुपयांची खंडणी दे, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नीलेश विठोबा गडदे (रा. कुपवाड) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बाज परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत लक्ष्मण पांडुरंग खरात (वय ४१, व्यवसाय मजुरी, रा. बाज) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. १० जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नीलेश गडदे व त्याचे दोन साथीदार लक्ष्मण खरात यांच्या बाज येथील निवासस्थानी आले. त्यावेळी लक्ष्मण खरात हे घरात नव्हते. नीलेश गडदे याने लक्ष्मण यांच्या पत्नी रंजना खरात यांना स्वतःची ओळख करून देत ‘लक्ष्मण खरात कुठे आहे’, अशी विचारणा केली. त्यावर रंजना यांनी ते बाहेर गेल्याचे सांगितले.
यानंतर नीलेश गडदे याने रंजना खरात यांना, ‘तुमच्या नवऱ्याला रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्याचे काम सोडायला सांगा. अन्यथा मला १० लाख रुपये द्यायला सांगा. जर तसे केले नाही तर मी त्याला जिवे मारीन’, अशी धमकी दिली. तसेच घरात असलेल्या लक्ष्मण यांच्या मुलांनाही ‘तुम्हाला तुमचा बाप हवा असेल तर माझ्या आडवे येऊ नकाे, म्हणून त्याला सांगा’, असे धमकावले.
दरम्यान, रात्री ८ वाजता लक्ष्मण खरात हे घरी आल्यानंतर पत्नीने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. दरम्यान गावातील माणिक ईश्वर खरात यांनी लक्ष्मण खरात यांना नीलेश गडदे याने त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बाज येथील अहिल्यादेवी चौकात पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची माहिती दिली.
या प्रकरणी लक्ष्मण खरात यांच्या फिर्यादीनुसार जत पोलिस ठाण्यात नीलेश गडदे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माथाडी कामगार नेत्याच्या नातवाचा हकनाक बळी
या संपूर्ण वादाला गुरुवारी सायंकाळी धक्कादायक वळण मिळाले. सांगलीतील संजयनगर येथे नीलेश गडदे याने गोळीबार केला. माथाडी कामगार नेते बाळू बंडगर यांनी यापूर्वी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर हल्ल्याच्या तयारीने नीलेश गुरुवारी त्यांच्या संजयनगर येथील घरात घुसला. मात्र ते हाती न लागल्याने बाळू बंडगर यांचा नातू व मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत याच्यावर गोळीबार केला. मालधक्क्यावरील ठेकेदारीच्या वादातून तेरा वर्षाच्या वेदांतचा हकनाक बळी गेला. या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ होत आहे.