आटपाडी : जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. आटपाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
याबाबत हाकेमळा येथील अतुल बळवंत हाके (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुमार, ६ जून रोजी सायंकाळी ते दुचाकीवरून आबानगर चौकाच्या दिशेने जात असताना संशयित कुणाल सचिन हाके (रा. आटपाडी) व सुजित लक्ष्मण सरगर (रा. मासाळवाडी) हे दुचाकीवरून आले. जमिनीच्या वादाच्या कारणावरून दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर कुणाल हाके याने लोखंडी रॉडने मानेवर वार करून जखमी केले तसेच मोटरसायकलची मोडतोड करून नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मासाळवाडी येथील सुजित लक्ष्मण सरगर (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आटपाडी येथील तलावाकडे जाणाऱ्या कॉर्नरवर उभे असताना अतुल हाके यांनी जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत “तू इकडे कशाला आला आहेस?” असे म्हणत दगडाने डोक्यात मारून जखमी केल्याचा आरोप केला आहे.