सांगली : महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. शुक्रवारी राजेश नाईक तसेच काँग्रेसचे नगरसेवक फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार इद्रिस नायकवडी यांची भेट घेतली. मात्र पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हेच निर्णय घेतील, असे आ. नायकवडी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेत सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याचा प्रस्ताव नाईक यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाही दिला आहे.
महापालिकेत भाजपला सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपचे बहुमत अवघ्या एका जागेने हुकले आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली होती, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने या आघाडीशी अघोषित समझोता केला होता. भाजप, शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. निवडणूक निकालानंतर भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष व शिवसेना यांना एकत्र घेत सत्ता स्थापन करण्याची तयारी चालवली आहे.
मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे तिन्ही पक्षांचा निर्णय जाहीर झालेला नाही. हे तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपचे 39, राष्ट्रवादीचे 16, शिवसेनेचे 2 असे एकूण 57 संख्याबळ होते. काँग्रेसचे 18, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3, राष्ट्रवादी (अजित पवार) 16 व शिवसेनेचे 2, असे एकूण 39 संख्याबळ होते. भाजपविरोधात हे चार पक्ष एकत्र आल्यास संख्याबळ 39 विरुद्ध 39 असे होते.
दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक व नगरसेवक फिरोज पठाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते आ. इद्रिस नायकवडी यांची भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याबाबत नायकवडी यांना प्रस्ताव दिला असल्याचे नाईक यांनी सांगितले. मात्र नायकवडी यांनी, याबाबत सर्व निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत, असे सांगितले.