सांगली : आयुक्तसत्यम गांधी यांनी शुक्रवारी जलशुद्धीकरण केंद्र, शेरीनाला पंपहाऊस तसेच अमरधाम स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली. जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करण्याचे आदेश दिले. अमरधाम स्मशानभूमीतील गॅस दाहिनी तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.
माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणी शुद्धीकरणाच्या प्रत्येक टप्प्याची आयुक्तांनी पाहणी केली. पाणी शुद्धीकरणाचे दररोजचे तपासणी अहवाल अद्ययावत ठेवण्याचे आणि त्यातील निकषांनुसार प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. क्लोरीनचे प्रमाण आणि गाळ उपसा करण्याच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना मिळणारे पाणी हे शंभर टक्के पिण्यायोग्यच असले पाहिजे, यात कोणतीही तांत्रिक चूक खपवून घेतली जाणार नाही, असे आयुक्त गांधी यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील उपस्थित होते.
सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या शेरीनाला जॅकवेलची पाहणी करताना आयुक्तांनी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर भर दिला. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज उपसा यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू राहावी, यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अमरधाम येथील गॅस दाहिनी गेल्या 10 दिवसांपासून एक्झॉस्ट मशीनमध्ये बिघाडामुळे बंद असल्याचे निदर्शनास आले. तातडीने नवीन मशीन बसवून ही सेवा पूर्ववत करण्याचे आदेश आयुक्त गांधी यांनी दिले.