बोरगाव : ईश्वरपूर-ताकारी मार्गावरील बोरगाव येथील वीटभट्टी चौक परिसरात भरधाव कारने दुसऱ्या कारला जोराची धडक दिल्याने पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला.
या अपघातात मानाजी प्रल्हाद पाटील (वय ५०, रा. बोरगाव), विजया भीमराव पाटील (७०), रोहित मधुकर लाड (२९), सुजय भीमराव पाटील (४९, सर्व रा. शिरटे) आणि सचिन आबासोा पाटील (४३, रा. येडेमच्छिंद्र) हे जखमी झाले आहेत. कार (एमएच ०९ एफक्यू ६८११) ही बहे येथून वाळव्याकडे भरधाव वेगाने जात होती. याचवेळी ईश्वरपूरहून बोरगावकडे फिर्यादी यांच्या कारने (एमएच १० ईके ८४४२) ही गाडी येत होती. येथील वीटभट्टी चौकात दोन्ही वाहने आली असता एका कारने दुसऱ्या गाडीच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली.
या अपघातात एका कारमधील एअरबॅग ओपन झाल्याने सुदैवाने कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, या कारच्या धडकेने दुसरी कार तीन वेळा पलटी होऊन सुमारे पन्नास फुटांवर जाऊन थांबली. या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत रोहित मधुकर लाड (वय २९, रा. शिरटे, ता. वाळवा) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.