भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी व अंकलखोप परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांसमोर यंदा गणेश विसर्जनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, नदीपात्राने तळ गाठला आहे. त्यामुळे मोठ्या आणि भव्य गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे कसे, असा बिकट प्रश्न गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
भिलवडी आणि अंकलखोप परिसराला गणेशोत्सवाची मोठी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. दरवर्षी भिलवडी, अंकलखोपसह तासगाव, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, हजारवाडी व बुरुंगवाडी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन याच ठिकाणी मोठ्या उत्साहात केले जाते. यावेळी नदीपात्रात भाविकांची मोठी गर्दी होत असते.
मात्र, यंदा नदीपात्रात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे विसर्जनानंतर गणेशमूर्ती पाण्याअभावी उघड्यावर राहून मूर्तींची अवहेलना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही भीती लक्षात घेऊन भाविकांच्या भावनांचा आदर करावा आणि विसर्जन सुलभ व्हावे यासाठी कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात तातडीने पुरेसे पाणी सोडावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक, युवक आणि गणेश मंडळांच्यावतीने केली जात आहे.