आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदी दुरुस्तीच्या नावाखाली परस्पर काढून नेल्याचा आरोप देणगीदार भाविकांनी केला आहे. या प्रकरणामुळे पुजारी, ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
श्री सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील खांब व छतावर भाविकांनी अर्पण केलेली चांदी कोणतीही अधिकृत नोंद, पंचनामा किंवा लेखी प्रक्रिया न करता काढली आहे. 24 किलो शुद्ध चांदी नोंदीशिवाय कशी काढली? ही बाबदेखील गंभीर आहे. वेजेगाव व देवीखिंडी (ता. खानापूर) येथील भाविकांनी श्रद्धेपोटी चांदीचे नक्षीकाम अर्पण केले होते. देवीखिंडी येथील शिवाजी पाटील यांनी 24 किलो शुद्ध चांदी मंदिराला दान दिली होती. काही दिवसांपूर्वी एका कारागिराने ‘चांदी दुरुस्तीसाठी न्यायची आहे,’ असे पत्र देवस्थानला दिले. त्यानंतर दुसऱ्या कारागिरासह गाभाऱ्यातील सर्व चांदी काढून नेण्यात आल्याचा आरोप आहे. किती चांदी होती, किती काढली, कुठे ठेवली, याची कोणतीही अधिकृत नोंद केलेली नाही. ही बाब पुजारी व ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर माहिती देणगीदार भाविकांपर्यंत पोहोचली.