सांगली ः बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी 17 लाख 34 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या चोरीमागे हरियाणातील टोळीचा हात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील टोलनाके चुकवित चोरटे सोलापूरच्या दिशेने पसार झाले आहेत. दरम्यान, चोरट्यांकडील मोटारीचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असून हा क्रमांक पुण्यातील आहे. पण हा क्रमांक बोगस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बुधगाव येथील बसथांब्यानजीक बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या केंद्रातील एटीएम मशीनमध्ये चार दिवसांपूर्वीच वीस लाखांची रोकड भरली होती. बुधवार दि. 21 रोजी पहाटे पाचच्या सुमारास मोटारीतून चोरटे आले. त्यांनी चेहर्याला काळा मास्क लावला होता. एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नव्हता. चोरट्यांनी सीसीटीव्हीवर काळा रंग स्प्रेने फासला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 17 लाख 34 हजार 400 रुपये रोकड अवघ्या काही मिनिटांत पळविली.
चोरट्यांनी एटीएम केंद्रावर प्रवेश केल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. सीसीटीव्हीत दोन चोरटे एटीएम केंद्रात शिरल्याचे, तर एक मोटारीत असल्याचे दिसून येते. या चोरीमागे हरियाणातील टोळीचा हात असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. यड्राव येथील चोरीमागेही हीच टोळी असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
बुधगाव येथील चोरीनंतर चोरटे कुमटे फाटा येथून सावळज, मणेराजुरीमागे शिरढोणपर्यंत गेले. सोलापूरच्या दिशेने जाताना चोरट्यांनी टोलनाके चुकविल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या शोधासाठी सांगली ग्रामीण पोलिसांसह एलसीबीची चार स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. चोरट्यांच्या मोटारीचा क्रमांक पुण्यातील आहे. पण तोही बोगस असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक किरण चौगले, सहायक फौजदार मेघराज रूपनर करीत आहेत.