नागज : विठ्ठल नलवडे
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील गजनृत्य कलेला दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाचे मानाचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आरेवाडीचे दहा गजनृत्य कलाकार सहभागी होऊन गजनृत्याचा आविष्कार सादर करणार आहेत.
आरेवाडीचे धनगरी गजनृत्य महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्राचा धनगरी ढोल राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात घुमणार आहे.
आरेवाडीतील गजनृत्य कलेला शेकडो वर्षांची परंपरा असून मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ही गजनृत्य कला यापूर्वी १९५८ साली दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सादर करण्यात आली होती. त्यानंतर इंग्लंड व रशिया या देशांमध्येही या कलेचे सादरीकरण झाले आहे. तसेच देशभरातील विविध राष्ट्रीय महोत्सवांमध्ये गजनृत्याने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रपती भवनमधील 'अॅट होम' समारंभाचे आमंत्रण म्हणजे या लोककलेसाठी 'मानाचा तुरा' ठरला आहे.
अनिल शामराव कोळेकर, दाजी बिरू कोळेकर, हणमंत पांडुरंग कोळेकर, संतोष शिवाजी कोळेकर, समाधान दाजी कोळेकर, प्रशांत चंद्रकांत कोळेकर, धोंडिराम शिवाजी कोळेकर, संजय भाऊ कोळेकर, प्रकाश दीपक पाटील, सुजल संभाजी पाटील हे कलाकार या कार्यक्रमात गजनृत्य कला सादर करणार आहेत.