सांगली : आरटीईतून आतापर्यंत 1 हजार 89 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र अजूनही सुमारे 812 प्रवेश होणे बाकी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून प्रवेशासाठी उत्साह दिसत नाही. त्यामुळे प्रवेश रखडले आहेत. प्रवेशासाठी दोन दिवसात प्रतीक्षा यादी लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात आरटीईमध्ये एकूण 231 शाळा आहेत. तेथे 1 हजार 901 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 2 हजार 365 पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. सोडत प्रक्रियेतून पहिल्या निवड यादीत 1 हजार 349 अर्जदार प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या योजनेतून प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व सोडतीमधून पात्र ठरलेल्या पालकांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर दि. 23 ते 31 जुलैअखेरपर्यंत पडताळणी समितीकडे संबंधितांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत 595 जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे. जिल्ह्यासह राज्यभर समाधानकारक प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात अनेकवेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र अजूनही समाधानकारक प्रवेश झालेले नाहीत. अजूनही 812 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांच्या प्रवेशासाठी दोन दिवसांत प्रतीक्षा यादी लागणार आहे. पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.