तासगाव : पदयात्रे -वरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला २०२९ मध्येच प्रत्युत्तर देऊ. जानेवारी २०२९ पर्यंत केवळ जनतेच्या कामांवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचा स्पष्ट इशारा आमदार रोहित पाटील यांनी दिला. तासगाव येथील ऐतिहासिक रथोत्सवात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव संपूर्ण परिसर मोठ्या दिमाखात साजरा करतो. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून शेतकरी आणि जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आपल्या संघर्षाची सुरुवात करत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आल्याचे सांगत, यंदा पाऊस कमी झाल्याने आगामी काळात निर्माण होणाऱ्या भीषण परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
आपल्या निवेदनात पाणी आणि शेतीशी संबंधित गंभीर समस्यांवर बोट ठेवत ते म्हणाले की, सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला तरी भविष्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, शासनाकडून अद्याप पाणी व चाऱ्याचे कोणतेही योग्य नियोजन दिसून येत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दररोज किमान आठ तास वीज उपलब्ध करून दिली पाहिजे आणि शेतीवरील सक्तीचे लोडशेडिंग तातडीने बंद केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आमदार रोहित पाटील यांनी मराठा आरक्षण, पेपरफुटी आणि प्रशासकीय मुद्द्यांवरूनही राज्य शासनावर जोरदार निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरत आहेत, त्यामुळे शासनाने प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून न नेता या प्रश्नावर तातडीने ठोस आणि अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.