Renavi Ghat ST bus accident
विटा : विजापूर - गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्या जवळच्या रेणावी घाटात दोन एसटी गाड्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा तीन झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी विट्यातील खासगी रुग्णालयात साक्षी चंद्रकांत पवार (वय १७) या कॉलेजच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. ती बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. दरम्यान, या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींचा सगळा खर्च राज्यशासन करेल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे.
विटा आगाराची विटा ते भिवघाट बस (क्र. एमएच १४ बीटी ३२५५) आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा बस (क्र.एमएच १४ बीटी ४२७०) यांचा काल गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता विट्या जवळील रेणावी घाटात मोठा अपघात झाला. विटा ते भिवघाट ही गाडी घेऊन चालक माणिक मंडले विट्याहून भिवघाटच्या दिशेने निघाले होते. रेणावी घाटाच्या चढतीकडे गाडी निघाली होती. त्याचवेळी विजापूर-मेढा बस (क्र.एमएच १४ बीटी ४२७०) रेणावी घाटातून विट्याच्या दिशेने खाली येत होती. या घाटातील वळणावर दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली. प्रत्यक्षदर्शी नुसार, घाटातील उतारावर मेढा डेपोच्या गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येत असलेल्या विटा आगाराच्या गाडी वर वेगाने येऊन आदळल्याने हा अपघात घडला.
यात खानापूरच्या रहिवाशी नंदा हरि दास त्र्यंबके (वय ६०) आणि बांबवडे (जि. सातारा) येथील धोंडीराम लक्ष्मण पाटील (वय ७८) हे दोघेज वृद्ध जागीच ठार झाले होते. या अपघातात एकूण ३८ जण जखमी झाले होते. यापैकी १७ जणांची प्रकृती गंभीर होती. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळकरी मुले-मुली यांचाही समावेश होता. आज सकाळी विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली साक्षी पवार हिचा मृत्यू झाला. तिच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला होता. साक्षी पवार ही खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावची आहे. तिची आई इस्त्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. साक्षीला एक छोटी बहिण आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. साक्षीचे वडील लहानपणीच वारले आहेत.
दरम्यान, रेणावी घाटातील एसटी अपघातील मृतांच्या वारसांना १० लाख रुपयांची मदत आणि जखमींचा सर्व खर्च शासन करणार अशी घोषणा प्रतापराव सरनाईक यांनी केली आहे. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा केला होता. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी रात्रीपासून आपण सातत्याने चर्चा करत होतो. या अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना परिवहन विभागाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन आणि एसटी महामंडळ करणार आहे, अशी माहिती आमदार बाबर यांनी दिली.
या अपघातातील सात गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगली, कराड आणि कोल्हापूर येथे हलवण्यात आले असून, १५ जणांवर विट्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी नऊ जण अतिदक्षता विभागात आहेत.