रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पुन्हा पाऊस सुरु वाढला आहे. चोवीस तासांत तब्बल २२४.७८ मिमी, तर सरासरी २४.९८ मिमी इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस लांजा ५९.२० मिमी, संगमेश्वर ४५.९२ मिमी, रत्नागिरी ४२.६२ मिमी इतका पाऊस झाला असून मंडणगडात सर्वात कमी पाऊस पडला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. विशेषत: लांजा, संगमेश्वर, चिपळूणात रात्री, सकाळच्या सत्रात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के पाऊस झाला आहे. एकूण पाऊस २१ हजार २०४, तर सरासरी २ हजार ३५६ मिमी इतका पडला आहे. गतवर्षी आजअखेर ८९.७७ टक्के, तर एकूण पाऊस २७ हजार १७९ मिमी, सरासरी ३ हजार मिमी इतका पाऊस झाला होता.
यंदा १९ टक्के पाऊस कमी पडला आहे. दरम्यान, सतत संततधार, मुसळधार पावसामुळे भात, नाचणी पिकांना जीवनदान मिळाले असून पिके बहरली आहेत. नद्या, धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. नातुवाडी धरणात ८०.७७ टक्के, गडनदी ८०.८ टक्के, अर्जुना धरणात १०० टक्के पाणी आहे. दुसरीकडे सततच्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाली आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे.